नि:शब्द एकाकी अश्रू
- मेलवीन डाबरे- वसईकर, गिरीज- वसई
इथे दहा जणांचं कुटुंब
तिथे तिघं वा चौघांचं कुटुंब
नावं मात्र एकत्र नि विभक्त कुटुंब/१/
इथे वाढली एका पाठोपाठ दहा-बारा
तिथेही वाढली एक वा दोन
इथे संस्कार अनेकांचे
तिथे मात्र दोघांचेच/२/
इथे शेती-वाडी मोलमजुरी करून कुटुंब जोपासली
तिथेही कंपनी-व्यवसाय-ऑफिस करून कुटुंबं उभारली
इथे मनाने श्रीमंत तर
तिथे धन-संपत्तीने /३/
इथे घर जणू वाडा माणसांनी भरलेला
तिथे घर म्हणजे आलिशान बंगला
सुख-सुविधांनी सुसज्ज असा/४/
वाड्यातून पडले एकेक बाहेर
नाव मिळालं झाले विभक्त
मी आणि माझं कुटुंब
वाडा झाला पडका नि वाड्यातील परके/५/
आई एक महिना माझ्याकडे व बाबा तुझ्याकडे
झाल्या दोघांच्या वाटण्या
या, नाहीतर रहा एकाकी वाड्यात
काहींची रवानगी झाली वृद्धाश्रमात तर काहींची अंधा-या खोलीत /६/
‘इथे’ला मिळाली तिलांजली
इच्छेविरुद्ध धावले तिथे मिळण्या सावली
पण पोटच्या गोळ्याने
जगण्याची हवाच काढली/७/
“करावे तसे भरावे’ या उक्तीप्रमाणे
तिथेही दोन्ही मुलं झाली स्थाईक परदेशी
म्हणाली,ना करिअर वा ब्राईट फ्युचर स्वदेशी
सर्वकाही आहे ते विदेशी/८/
वाड्याप्रमाणे जमीन जुमला नि बंगला ही पडला ओस
कधी येणार,कधी येणार ही वाट पाहत
लागला त्यांना पाहण्याचा व नातवंडांना कुरवाळण्याचा सोस/९/
झालो बाळगी जाऊन वारंवार परदेशी
पण ओढ सदैव मनात
‘गड्या अपुला देश बरा’
म्हणत परतले मायदेशी /१०/
इथेही नाहीत,तिथेही नाहीत
आहेत फक्त जुने क्षण
राहून राहून एवढंच आठवतं
ह्याचसाठी केला होता का अट्टाहास
पण नाही होत विस्मरण /११/
नाही जवळी कुणी समजून घेण्या, संवाद साधण्या
आहेत केवळ आठवणी आणि
ओघळणारे पण नि;शब्द एकाकी अश्रू/१२/
मी राहिलो ना माझा नि ना झालो इतरांचा
माझे झाले परके ,विसरले नाते
अशा या कठिणप्रसंगी ,हे ईश्वरा केवळ नि केवळ
तुझीच आठवण येते रे देवा
तुझीच आठवण येते……/१३/